जनसंपर्क न्यूज – इंग्लंडमध्ये 31 मे ते 14 जुलै या कालावधीत होणार्या एक दिवसीय वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाची घोषणा मुंबईत सोमवारी करण्यात आली. अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक, युवा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आणि फलंदाज लोकेश राहुल यांना अंतिम 15 जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनीसह पर्यायी यष्टीरक्षक म्हणून अभुनवी दिनेश कार्तिकवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे.
‘ती’ खेळी ठरली निर्णायक
तमिळनाडूच्या या खेळाडूने मधल्या फळीमध्ये टीम इंडियाला मजबुती दिली आहे. अनेकवेळा आपल्या फलंदाजीच्या जोरावर कार्तिकने ऐतिहासिक विजय मिळवून दिले. कोलंबोमध्ये झालेल्या निदास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कार्तिकने बांगलादेशविरुद्ध 8 चेंडूत 29 धावा फटकावून विजय खेचून आणला होता. ती खेळीच कार्तिकसाठी निर्णायक ठरली आहे.
कारकीर्दीमध्ये अनेक चढउतार
कार्तिकने 2004 मध्ये कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच दरम्यान धोनीने देखील पदार्पण केले आणि आपली जागा पक्की केली. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 चा विश्वचषक जिंकला आणि तेव्हापासून कार्तिकासाठी टीम इंडियाचे द्वार फक्त धोनीच्या अनुपस्थितीमध्ये उघडले गेले. 15 वर्षाच्या दीर्घ कारकीर्दीनंतरही कार्तिकच्या नावावर फक्त 91 एक दिवसीय आणि 26 कसोटी सामने आहेत. त्याने 32 टी सामनेही खेळले आहेत. 91 एक दिवसीय सामन्यात कार्तिकने 9 अर्धशतकांसह 1738 धावा आणि 26 कसोटीत 1 शतक व 7 अर्धशतकांसह 1025 धावा त्याच्या नावावर आहेत. टी-20 मध्ये 32 सामन्यात 399 धावा त्याने केल्य़ा आहेत.
















































