जनसंपर्क न्यूज – सातारा दि. १ मे (जि.मा.का.): महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापनदिनी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी महराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणा प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सातारचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. अशा या द्रष्ट्या नेत्याचे स्मरण आजच्या दिनी ठेवणं हे तुम्हा-आम्हा सर्वांचेच कर्तव्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलीदान दिलेल्या 105 हुतात्म्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
विविध पथकांनी दिमाखदार संचलन केले. यावेळी पहिल्यांदाच क्रीडा विभागातर्फे राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंनीही संचलन केले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूंबीय व निमंत्रितांची भेट घेतली. ध्वजारोहणाच्या या सोहळ्यास अधीक्षक अभियंता विजय घोगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

















































