फटाक्यांना नाही म्हणा अनमोल पर्यावरणाचे संरक्षण करा – डॉ. कल्याण गंगवाल 

207

जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – फटाक्यांना नाही म्हणत दीपावली साजरी करत या दीपावलीत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करूया आणि फटाके वाजवण्यापासून परावृत्त होवू या.  फटाक्यांवर कायद्याने केवळ बंदीच नाही, तर मानवी आरोग्याला, प्राण्यांचे कल्याण आणि आपल्या पर्यावरणाला होणाऱ्या अत्यंत हानीमुळे त्यांचा वापर करणे हा फौजदारी गुन्हा मानला जातो. म्हणून फटाक्यांना नाही म्हणत अनमोल पर्यावरणाचे संरक्षण करा असे आवाहन सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शाकाहार प्रणेता – डॉ कल्याण गंगवाल यांनी केले आहे.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले की आपण जेव्हा फटाके जाळतो तेव्हा कठोर कष्टाने कमावलेला पैसा जाळीत असतो. आजही आपल्या देशातील अनेक जण बेघर आहेत. अशी बेघर शहरे आणि गरिबांची लोकसंख्या सतत वाढते आहे. बेरोजगारीचा प्रश्न बिकट बनला आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, आपल्याला माहीत असलेला सर्वात गरीब आठवा आणि त्याचा चेहरा नजरेसमोर आणा. नंतर आपण जी कृती करणार त्याने त्या गरीब माणसाला काय फायदा होणार आहे, याचा विचार करा. मग नक्कीच आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

ते पुढे म्हणाले की फटाक्यांच्या ज्वलनामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दमा, डोळे चुरचुरणे, आग होणे, श्वसन मार्गाचा दाह, घसा खाजणे, असे प्रदूषित वायूमुळे अनेक दुष्परिणाम होतात. प्रचंड आवाजामुळे अकाली बहिरेपणाकडे होणारी वाटचाल ठरू शकते. निद्रानाश, चिडचिडेपणा, डोकेदुखी, सततची सर्दी, खोकला यामुळे आपण आपले व इतरांचे आयुष्य कमी करतो. फटाक्यांच्या स्फोटांमुळे होणारी आवाजाची तीव्रता ११५ ते १२० डेसिबल्सपेक्षाही अधिक असते. साधारणतः ३० सेकंदांपेक्षा जास्त काळ एवढा मोठा आवाज कानावर पडल्यास कानांना तात्पुरती किंवा कायमची इजा होऊ शकते. अचानक मोठा फटाका खूप जवळ फुटल्यास कानांचे पडदे फाटण्याचीही शक्यता असते.

फटाक्यांचा आवाज मानव आणि प्राणी दोघांनाही असह्य आहे, ज्यामुळे अनेकदा आघात आणि चिंता निर्माण होते, विशेषत: पाळीव प्राणी आणि वन्यजीवांमध्ये.  पक्षी आणि प्राण्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो, काहीवेळा अपघात आणि मृत्यू होतात. आपल्याला माणुसकीशी आणि निसर्गाशी नाते जोडायचे असेल तर, फटाक्यांना ‘नाही’ म्हणावेच लागेल. आता फटाकासुराचा वध झालाच पाहिजे. तेव्हाच आम्ही सात्विक आनंदाचे जीवन जगू शकतो. असे डॉ कल्याण गंगवाल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.