राज्यातल्या अडीचशे घराण्यांनी वर्षानुवर्षे महाराष्ट्र लुटला – चंद्रकांत पाटील

595

जनसंपर्क न्यूज – (कोल्हापूर ) राज्यातल्या अडीचशे घराण्यांनी वर्षानुवर्षे महाराष्ट्र लुटला आहे. या सर्वांची चौकशी होणारच, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिला.

केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित भाजप प्रवेश मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. आमदार अमल महाडीक, ग्रामीण अध्यक्ष हिंदुराव शेळके ,पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यावेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र लुटणाऱ्या अडीचशे घराण्यांना मागच्या पाच वर्षात आम्ही हात लाऊ शकलो नाही, कारण आम्हाला सरकार सुरळीत चालवायचे होते. आता येणारे सरकार हे मजबूत सरकार असेल. त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची सुटका आता कशी काय होणार, आता त्यांना त्यांचे हिशोब चुकते करावेच लागणार आहेत. कारण सर्वसामान्यांच्या पैशाला त्यांनी हात लावला आहे. त्यामुळे यांची चाैकशी होणारच असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रावर गेल्या साठ वर्षात अडीचशे घराण्यांनी सत्ता गाजविली. या घराण्यांनी अक्षरशा महाराष्ट्र लुटला. आता राज्यात भाजपा शिवसेनेचे मजबूत सरकार सत्तेवर आणायचे आहे. 250 प्लस जागा महाराष्ट्रात महायुतीच्या येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लुटणाऱ्यंचा हिशोब चुकत करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची चौकशीही होणारच आहे.